हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – २

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे ( ब्रह्मदण्ड, सुदर्शन चक्र, त्रिशूळ)
आपल्या हिंदू पुराणग्रंथांमध्ये म्हणजेच रामायण, महाभारत, विष्णुपुराण , गरुडपुराण यांत असंख्य दिव्य शस्त्रांस्त्रांचा उल्लेख आढळतो. तेव्हाची ही हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे आताच्या अणुबॉम्बपेक्षाही प्रचंड विनाशकारी होती. एका शस्त्राच्या उपयोगाने असंख्य सैनिकांचा संहार होत असे. ही सर्व शस्त्रांस्त्रे मिळवण्यासाठी त्या इष्ट देवतेची आराधना करावी लागत असे. भक्ताच्या तपश्चर्येने प्रसन्न झाल्यावर देवता आपले शस्त्र त्या भक्ताला प्रदान करत असे. अशाच काही दिव्य शश्त्रात्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
आपण या घडीला पाहत आहोत त्रिदेवांची प्रमुख शस्त्रे!
ब्रह्मदण्ड

जीवसृष्टीला जन्म देणारे परमपिता ब्रह्मा यांनी त्यांचे स्वतःचे असे एक खास आयुध तयार केले आहे ज्यापुढे भगवान नारायण आणि भगवान महेश यांचे आयुध वगळता विश्वातील कोणत्याही प्रकारचे अस्त्र वा शस्त्र पूर्णपणे निकामी ठरेल. ब्रह्मदेवांनी तयार केलेल्या या आयुधाचे नाव आहे, ‘ब्रह्मदण्ड’!
हे आयुध म्हणजे विशेष तेजस्वी दण्ड असून ज्याच्या शरीरात खुद्द ब्रह्मदेवांचा अंश प्रस्थापित असेल निव्वळ त्याच ऋषीला या आयुधाला हात लावता येतो वा याचे आवाहन करून त्याला जागृत करता येते. ज्याच्या शरीरात ब्रह्मतेज अस्तित्वात आहे अश्या ऋषीला ब्रह्मर्षी असे म्हणतात. ब्रम्हदेवांचे पुत्र असलेले वसिष्ठ मुनि एकमात्र ब्रह्मर्षी आहेत ज्यांच्या देहात ब्रह्मदण्डाला आवाक्यात आणायचे सामर्थ्य दिसून येत असल्याचे उल्लेख आपल्याला पुराणात आढळून येतात.
भगवान ब्रह्मा यांना जन्मतः पाच मस्तके होती, ज्यामुळे त्यांना पंचानन असेही म्हटले जात असे. पुढे कालांतराने भगवान विष्णु यांनी नियतीच्या नियमांना अनुसरून भगवान ब्रह्मा यांचे एक शीर धडावेगळे केले ज्यापासून ब्रह्मशिर अस्त्राची निर्मिती करण्यात आली. परंतु या क्रियेच्या आधी भगवान ब्रह्मा यांना पाच मस्तके असतानाच त्यांनी निसर्गाचे संतुलन आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी एका सक्षम दण्डाची निर्मिती केली होती त्यात त्यांच्या पाचही मस्तकांची शक्ति विराजमान असून हा दण्ड अत्यंत विनाशकारी ब्रह्मास्त्र आणि त्यालाच टक्कर देणारे ब्रह्मशिर अस्त्र या दोहोंना गिळंकृत करण्यास सक्षम होता.
विश्वामित्र राजा असताना त्यांनी ब्रह्मर्षी वसिष्ठ यांची कामधेनु पळवून नेण्यासाठी कित्येक अक्षौहिणी सेना पाठवली होती पण वसिष्ठांच्या ब्रह्मदण्डाने तो सारा पसारा समूळ गिळंकृत केला होता. ब्रम्हांडातील चौदा आकाशगंगांचा एका फटक्यात विनाश करायचे सामर्थ्य निव्वळ एका ब्रह्मदण्डात सामावलेले दिसून येते.
सुदर्शन चक्र

जीवसृष्टीचे पालन करणारे भगवान विष्णु यांचे स्वतःचे असे एक खास आयुध आहे जे एकदा प्रक्षेपित केल्यावर अत्यन्त कमी कालावधीत पूर्ण वेगाने त्याच्या लक्ष्याचा अचूक वेध घेतल्याशिवाय पुन्हा माघारी परतत नाही, ज्याचे नाव आहे ‘सुदर्शन चक्र’!
सुदर्शन चक्र हे एक असे आयुध आहे जे जागृत केल्यावर आपल्या स्वामीच्या तर्जनीवर (पहिले बोट) प्रचंड वेगाने त्याच्या गोलाकार कक्षेत फिरू लागते. हवेत होणार्या त्याच्या घर्षणामुळे तीव्र वेगाने अग्नी प्रज्वलित होतो आणि त्यानंतर निर्धारित लक्ष्याचा वेध घेण्यासाठी ते कूच करते.
सुदर्शन चक्र हे भगवान विष्णु यांचे आयुध असले तरी त्याची निर्मिती प्रत्यक्षात भगवान महेश यांनी केली आहे. त्या बाबतीत एक कथा अशी सांगितली जाते:
कोटीरुद्रसंहितेनुसार, दैत्यांचे अत्याचार वाढलेले पाहून सर्व देव रक्षण करण्यासाठी भगवान विष्णु यांच्याकडे शरण गेले. त्यांचा विनाश करण्यासाठी त्यावेळी भगवान विष्णु यांच्याकडे कुठलेही अस्त्र नव्हते म्हणून ते कैलास पर्वतावर भगवान महेश यांची आराधना करण्यास गेले. सहस्त्र वेळा शिवाचे नामोच्चारण करूत दरवेळी एकेक कमलपुष्प वाहण्यास त्यांनी सुरवात केली. त्यांची परीक्षा घेण्यासाठी महेश यांनी हळूच त्यातील एक फूल लपवून ठेवले. भगवान विष्णु तल्लीन असल्याने त्यांच्या लक्षात काहीच आले नाही परंतू नन्तर त्यांनी त्या एका फुलाची कमतरता भरून काढण्यासाठी आपला एक डोळा (कमलनयन) काढून शिवाला अर्पण केला. भगवान महेश प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यानंतर विष्णुंना कायमस्वरुपी सुदर्शन चक्र प्रदान केले.
कृष्ण अवतारात भगवान परशुराम यांच्याकडून भगवान कृष्ण यांना हेच सुदर्शन चक्र पुन्हा एकदा प्राप्त झाले होते.
त्रिशूळ

जीवसृष्टीवर दुर्जनांचा विनाश करणाऱ्या महाकाल भगवान महेश यांचे स्वतःचे असे एक खास आयुध आहे ज्याला टोकदार तीन सुळे असून ते दूरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी वापरले जाते, ज्याचे नाव आहे ‘त्रिशूळ’!
देवांचे शस्त्र निर्माते त्वष्टा यांनी सुर्याचे वैष्णव तेज कानशीने घासून त्रिशूल तयार केला, असे मत्स्य आणि विष्णुपुराणांत म्हंटले आहे. यात धातूचे तीन टोकदार भाले एका धातूच्या, वा लाकडी मुठीवर बसवून त्यांना एक लांब दांडा जोडला जातो जो प्रक्षेपित केल्यावर वार्याला चिरत लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकेल.
त्रिशूळाच्या तीन शूळांना अनन्यसाधारण महत्व आहे. तीन तीनच्या संचात येणार्या कित्येक गोष्टींचे ते सूचक मानले जाते. सत्व, रज आणि तम हे त्रिगुण आणि त्यातून प्रगट होणार्या, उत्पत्ती, पालन आणि विनाश या तीन वृत्ती, तीन त्रिदेवांचे ते द्योतक आहे.
भूत, वर्तमान आणि भविष्य हे तीन काळ, स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ असे तीन लोक, इतकेच नाही तर; दैहिक, दैविक आणि भौतिक असे तीन त्रिताप अश्या कित्येक गोष्टींचे प्रतीक म्हणून त्रिशूळाकडे पाहिले जाते.
धार्मिक आणि अन्य कित्येक प्रसंगांत त्रिशूळ पूजन अत्यंत पवित्र मानले जाते. महादेवाच्या प्रत्येक मंदिरात एक तरी त्रिशूळ हमखास पाहता येतो. त्रिदेवांच्या ज्योती मधून प्रकट झालेल्या दुर्गा देवीना भगवान महेश यांनी आपले आयुध प्रदान केले होते म्हणूनच देवींच्या हातातही एक प्रमुख आयुध म्हणून त्रिशूळाला अनन्यसाधारण महत्व आहे.
Also Read
हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – १
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT
weapons used in Mahabharata, ancient weapons, weapons used in Ramayana, महाभारतात वापरलेली शस्त्रे , रामायणात वापरलेली शस्त्रे , bramhastra , pashupatastra, narayanastra, trishul, sudarshan, bramhadand , हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

No Comment