हिंदू पुराणांतील काही महत्वाचे नाग

हिंदू पुराणांतील काही महत्वाचे नाग

 

महाभारताच्या आदिपर्वात नागांविषयी सांगण्यात आले आहे. त्यावेळी ऋषी कश्यप नावाचे एक तपस्वी महर्षी होते. त्यांना 13 पत्नी होत्या, त्यापैकी एका पत्नीचे नाव कद्रू होते. ऋषी कद्रू आणि कश्यप यांची मुले म्हणून नागांचा जन्म झाला. कश्यप ऋषींना आणखी एक पत्नी विनता होती. पक्षिराज गरुड हे विनताचे पुत्र आहेत. पुढे गरुड हे श्रीविष्णूचे वाहन झाले.

कद्रू विनताचा द्वेष करत असे आणि तिला कोणत्या न कोणत्या प्रकारे अपमानित करण्याचा प्रयत्न करत राहत होती. विनताला पैज लावण्याची वाईट सवय होती. याचा फायदा घेऊन कद्रूने एक पैज लावली की उच्चैश्रवा घोडा पांढरा आहे, पण त्याची शेपटी काळी आहे. विनता म्हणाली की त्या घोड्याची शेपटीसुद्धा पांढरी आहे.

वास्तविक त्या घोड्याची शेपटी पांढरीच होती. विनताला पराभूत करण्यासाठी कद्रूने आपल्या नागपुत्रांना त्यांचा आकार केसांसारखा बनवून त्या घोड्याच्या शेपटीवर बसण्यास सांगितले. असे केल्याने विनताला दुरूनच घोड्याची शेपटी काळी दिसेल आणि तो पैज हरेल.

काही नागांनी कद्रूची आज्ञा पाळण्यास नकार दिला होता, मग कद्रूने आपल्याच पुत्रांना यज्ञात भस्म होण्याचा शाप दिला. शापाच्या भीतीने सर्व नागपुत्र उच्छैश्रावाचे घोड्याच्या शेपटीवर बसले. विनताने तो घोडा पाहिला तेव्हा त्याची शेपटी काळी दिसत होती. विनताने तिचा पराभव स्वीकार केला आणि कद्रूने तिच्याच बहिणीला दासी बनवले.

त्यानंतर गरुडाचा जन्म झाला आणि त्याला कळले की त्याची आई त्याचीच बहीण कद्रूची दासी का झाली आहे. तेव्हा त्याने कद्रूला विचारले की माझ्या आईला कसे मुक्त करू शकतेस? माझी आई गुलामगिरीतून मुक्त व्हावी म्हणून मी तुझ्यासाठी काय करू?

त्यावेळी सर्व नागांनी सांगितले की, तू अमृत कलश घेऊन ये आणि आम्हाला दे, त्यानंतर आम्ही तुझ्या आईला मुक्त करू. कद्रू आणि नागांचे म्हणणे पूर्ण करण्यासाठी गरुडाने अमृत कलश आणून आपली आई विनता हिला गुलामगिरीतून मुक्त केले.

 

हिंदू पुराणांतील काही महत्वाचे नाग

 

१) नागराज शेष  

 

महर्षि कश्यप आणि त्यांची सर्पपत्नी कद्रू यांच्या एक हजार पुत्रांमध्ये सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणजे नागराज शेष. ज्यांना सर्वसामान्यपणे शेषनाग वा आदिशेष या नावांनीही ओळखले जाते. भगवान विष्णु यांचे परमभक्त असलेले नागराज शेष क्षीरसागरात नारायणांची शैया म्हणून निवास करतात. आपली सावत्र आई विनता जी पक्षीराज गरुड आणि सूर्यदेवाचे सारथी पक्षीराज अरुण यांची माता आहे, तिच्यासोबत स्वतःच्या आईने अत्यन्त जालिम आणि अशिष्ट व्यवहार केल्याने सांसारिक आयुष्याला कंटाळून नागराज शेष कायमचे भगवान श्री हरींच्या सेवेत रुजू झाले. पौराणिक मान्यतेनुसार नागराज शेष यांना एक हजार फणा आहेत. त्यांचा आकार इतका विशाल आहे की, ना त्यांना आदि ना त्यांना अंत, म्हणूनच त्यांना ‘अनंतनाग’ असेही म्हणतात. आपल्या एका मस्तकावर ते पृथ्वी तर आपल्या शेपटावर ते संपूर्ण ब्रह्मांडाचा भार सांभाळत असतात. जोवर ते सरळ रेषेत चालत असतात तोवर विश्व एका सरळ रेषेत संचलित होत असते. ज्यावेळी ते आपला मार्ग बदलतात त्या वेळी प्रलय येण्याचा धोका संभावतो. भगवान विष्णु यांच्यासोबत आजन्म सहवास करणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे ज्या ज्या वेळी नारायण अवतार घेतात त्या त्या वेळी नागराज शेष त्यांची सोबत करतात. त्रेतायुगात ज्यावेळी नारायणांनी श्री राम म्हणून अवतार ग्रहण केला त्यावेळी नागराज शेष यानी लक्ष्मण म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला तर द्वापरयुगात नारायणांनी श्री कृष्ण म्हणून अवतार ग्रहण केल्यावर त्यावेळी नागराज शेष बलराम म्हणून पृथ्वीवर जन्म घेऊन त्यांची सोबत करत होते.    

 

२) नागराज वासुकी  

 

महर्षि कश्यप आणि त्यांची सर्पपत्नी कद्रू यांच्या एक हजार पुत्रांमधील द्वितीय पुत्र म्हणजे नागराज वासुकी. नागराज शेष यांनी नागलोकाचा त्याग केल्यावर त्याचे द्वितीय बंधू वासुकी यांना राज्याभिषेक करण्यात आला. शंभर फणा असलेल्या त्यांच्या पत्नीचे नाव शतशीर्षा असे आहे. नागराज वासुकी महादेवाचे परम भक्त मानले जातात. ज्या ज्या वेळी देवतांना त्यांच्या सहाय्याची आवश्यकता भासली त्या त्या वेळी त्यांनी सहाय्य देऊ केले. आपला प्रचंड विस्तीर्ण आकार आणि कमालीची मजबूत लवचिकता यामुळे त्यांनी समुद्रमंथनाच्या वेळी मंदारगिरी पर्वताला रवी सारखा वेढा घालून समुद्र घुसळण्यासाठी अजस्त्र दोरखंडासारखे काम केले. संपूर्ण शरीर रक्तबंबाळ होऊनही ते मागे हटले नाहीत म्हणून त्यांच्या कार्यावर प्रसन्न होऊन हलाहल प्राशन करणार्‍या महादेवांनी नागराज वासुकी यांना आपल्या गळ्यात मोलाचे स्थान बहाल केले. पुढील काळात होणारा नागवंशाचा अंत त्यांना आधीच दिसून आल्याने त्यांनी आपली लहान भगिनी मनसा हिचा विवाह महर्षि जरत्कारू यांच्या सोबत करवून दिला. मनसा आणि जरत्कारू यांचे पुत्र महर्षि आस्तिक यांनी पुढील काळात महाराज जनमेजय यांनी नाग जातीच्या विनाशासाठी आरंभ केलेले सर्पसत्र थांबविण्यात भूमिका बजावली. महादेवांना ज्यावेळी एका लक्ष्यात तिन्ही त्रिपुरांचा वेध घ्यायचा होता त्यावेळी महादेवांच्या पिनाक (शिवधनुष्य) धनुष्यावरून अमोघ पाशुपतास्त्र प्रक्षेपित करण्यासाठी धनुष्याची प्रत्यंचा बनण्याचे काम नागराज वासुकी यांनी सांभाळले होते. ब्रह्मांडातील सर्वाधिक गूढ, अलौकिक आणि मौल्यवान असा नागमणी नागराज वासुकी यांच्या मस्तकावर विराजमान असल्याचे दाखले आपल्याला पुराणात आढळून येतात.  

३) नागराज तक्षक

महर्षि कश्यप आणि त्यांची सर्पपत्नी कद्रू यांच्या एक हजार पुत्रांमधील तृतीय पुत्र म्हणजे नागराज तक्षक. ज्या आठ प्रमुख नागांनी नागराज्य उभे केले त्यातील कोशवश वर्गाचा प्रमुख काद्रवेय नाग म्हणून नागराज तक्षक यांना ओळखले जाते. महाभारत काळातील खांडवप्रस्थ ज्याला नन्तर तक्षशिला म्हटले गेले तीच यांची राजधानी होती. प्रचंड क्रोधी, अतिजहाल विष असलेले नागराज म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. महाभारत काळात अर्जुनाने खांडवप्रस्थ येथील वनाला लावलेल्या आगीत नागराज तक्षक यांच्या परिवाराला झळा झेलाव्या लागल्या होत्या. त्या वेळी नागराज तक्षक तिथे स्वतः उपस्थित नव्हते. त्यांच्या पत्न्नीला या आगीत मृत्यूला सामोरे जावे लागले. याचाच बदला घेण्यासाठी महाभारत युद्धात नागराज तक्षक यांचे दोन पुत्र, थोरला अश्वपती आणि धाकटा बृहद्बल पांडवांच्या विरोधी पक्षात उभे ठाकले होते. त्यानंतरच्या काळात महर्षि श्रृंगी यांनी पांडवांचे वंशज महाराज परीक्षित यांना दिलेल्या शापाची पूर्तता करण्यासाठी नागराज तक्षक यांनी त्यांना दंश केला. या घटनेमुळे व्यथित झालेले महाराज परीक्षित यांचे पुत्र महाराज जनमेजय यांनी नागराज तक्षक सहित संपूर्ण नागकुळाचा अंत करण्यासाठी सर्पसत्राचे आयोजन करून त्यात समस्त सर्प वंशाचा संहार आरंभ केला होता. जिवाच्या भीतीने घाबरून देवराज इंद्रांकडे लपून बसलेल्या नागराज तक्षकाचे नाव घेऊन यज्ञात हवि अर्पण करताच नागराज तक्षक स्वर्गातून यज्ञकुंडाच्या दिशेने खेचले जाऊ लागले. ते कुंडात पडणार याच्या आधीच तिथे उपस्थित झालेल्या महर्षि आस्तिक यांनी त्यांच्या सहित उरलेल्या सर्व नाग वंशाचे प्राण वाचविले असे नमूद केलेले आहे.

पौराणिक ग्रंथात पुढीलप्रमाणे अष्टनागांची नावे आहेत- शेष (अनंत), वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख.

भारतात, वरील आठांच्या कुळाचे विस्तार झाले ज्यामध्ये नागवंशी आहेत- नल, कवर्धा, फणि-नाग, भोगिन, सदाचंद्र, धनधर्मा, भूतनंदि, शिशुनंदि किंवा यशनंदि तनक, तुश्त, ऐरावत, धृतराष्ट्र, अहि, मणिभद्र, अलापत्र, कम्बल, अंशतर, धनंजय, कालिया, सौंफू, दौद्धिया, काली, तखतू, धूमल, फाहल, काना, गुलिका, सरकोटा, कालिया, अश्वसेन इतर साप कुळांची नावे आहेत.

अथर्ववेदमध्ये काही नागांच्या नावांचे उल्लेख आढळतात. हे नाग आहेत- श्वित्र, स्वज, पृदाक, कल्माष, ग्रीव आणि तिरिचराजी. नागांमध्ये चित कोबरा (पृश्चि), काळा फणियर (करैत), गवत रंगीत (उपतृण्य), पिवळा (ब्रम), असिता रंगरहित (अलीक), दासी, दुहित, असति, तगात, अमोक आणि तवस्तु अशा इतर कुळांची नावे आढळतात.

पौराणिक कथांनुसार पाताळात एका जागी नागलोक हे मानवी स्वरूपात सर्प होते. सात प्रकाराच्या पातालपैकी महातळात नागलोक वसलेलं होते. जेथे कश्यपच्या पत्नी कद्रू आणि क्रोधवश उत्पन्न झालेले अनेक डोक्यांचे नाग आणि सर्पांचा एक गट राहत होता. त्यात कहुक, तक्षक, कालिया आणि सुषेण आदि मुख्य सर्प होते.

  Also Read हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – १

हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – २

हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?

गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??

अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती

Follow PRATILIKHIT

weapons used in Mahabharata, ancient weapons, weapons used in Ramayana, महाभारतात वापरलेली शस्त्रे , रामायणात वापरलेली शस्त्रे , bramhastra , pashupatastra, narayanastra, trishul, sudarshan, bramhadand , हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

63420cookie-checkहिंदू पुराणांतील काही महत्वाचे नाग

Related Posts

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा । Narak Chaturdashi in Marathi

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा । Narak Chaturdashi in Marathi

श्रीकृष्ण कोण होता?

श्रीकृष्ण कोण होता?

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे

भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 248,251 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories