कैलाश मंदिर | Kailash Temple
कैलाश मंदिर (Kailash Temple information in Marathi)
हे जगातील अभियांत्रिकीचा अविष्कार असलेली एकमेवाद्वितीय अशी कलाकृती मानली जाते. राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत अगदी लहान प्रमाणावर आरंभण्यात आलेल्या ह्या शिवमंदिरास राष्ट्रकूट वंशातील शक्तिशाली राजा कृष्ण (प्रथम) याने सन ७५६ ते ७७५ या कालखंडात पूर्ण रूप दिले असे सांगितले जाते. कैलाशमंदिर हे वेरूळच्या चौतीस गुहांपैकी सोळाव्या गुहेमध्ये बांधण्यात आलेले आहे. ह्या मंदिराचे बांधकाम जवळपास १५० वर्षे अविरत सुरु होते आणि मंदिर बांधण्यासाठी तब्बल ७००० मजुरांनी हातभार लावला आहे. काही जणांच्या मते हे मंदिर १८ वर्षात बांधून पूर्ण झालं.

कैलाश मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण भारतीय शैलीचे असून आत प्रवेश करताना द्वारपाल आणि डाव्या बाजूला गणेश, उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनी आणि गजाभिषिक्त लक्ष्मी आपणास दिसते. मंदिराचा मुख्य भाग असलेल्या उंच अधिष्ठानाच्या दोन्ही बाजूला रामायण, महाभारत ह्या महाकाव्यातील कथानक कोरलेले आहे. उजव्या बाजूला दशानन रावण कैलास पर्वत आपल्या दोन्ही हातानी हलवत असल्याचा प्रसंग शिल्पित केलेला आहे. पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार मंदिरात तीन कोटीपेक्षा जास्त संस्कृत सुभाषिते कोरलेली आहेत.

कैलाश मंदिराबाबत एक कथासुद्धा प्रचलित आहे. असं म्हटलं जातं की राजाला आजारातून वाचवण्यासाठी त्याच्या राणीने शंकराची आराधना केली आणि शिव मंदिर बांधण्याचा संकल्प केला. राणीने अशी शपथ देखील घेतली की जोपर्यंत मंदिराचा कळस दिसणार नाही ती अन्नाचा एक कणसुद्धा ग्रहण करणार नाही. राजाच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर तिने मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक वास्तुकारांना बोलावणे पाठवले. पण सगळ्याच वास्तुकारांचं असं मत पडलं कि मंदिराच्या पूर्ण निर्मितीसाठी अनेक वर्षे लागतील. आता इतकी वर्षे अन्नावाचून राहणं काही राणीला शक्य नव्हतं. तेव्हा एक वास्तुकार ओकासा याने दावा केला कि तो ह्या मंदिराची निर्मिती करण्याचं काम हाती घेईल आणि एका आठवड्याच्या आत मंदिराचा कळस दिसू लागेल आणि म्हणूनच राणीची शपथ पूर्ण करण्यासाठी या मंदिराचा कळस पहिला कोरण्यात आला, त्यानंतर मग हळूहळू इतर मंदिर खाली खाली कोरण्याचं काम करण्यात आलं.

असे म्हटले जाते की औरंगजेबाने १६८२ मध्ये हे मंदिर पाडण्यासाठी एक हजार मजुरांना तब्बल तीन वर्षे कामाला लावले होते पण एवढ्या कालावधीतसुद्धा त्या मजुरांना मंदिराच्या काही मूर्ती पाडण्यातच यश आले. शेवटी औरंगजेबाने शरणागती पत्करली आणि मंदिर पडण्याचा विचार मनातून काढून टाकला.
Follow AncientIndiaMarathi
Follow PRATILIKHIT
https://pratikpravinmhatre.com/

3 Comments