२०२०

२०२०

२०२० वर्ष हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं कधीही विसरता न येणारं वर्ष आहे. या वर्षात आपण अशा गोष्टी अनुभवल्या ज्याची आपण कधीही कल्पना केली नव्हती. वर्षाच्या सुरुवातीला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नवीन वर्षाचे संकल्प केले असतील. पण खूपच थोड्या जणांना ते पूर्ण करता आले. मार्च पासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आणि स्वतःला सर्वशक्तिमान समजणाऱ्या माणसाची अस्तित्वाची लढाई सुरू झाली. सामाजिक प्राणी म्हणून ओळखला जाणारा माणूस घराबाहेर पडण्याआधी दहा वेळा विचार करू लागला आणि अनेक चांगले वाईट बदल आपल्या दैनंदिन शिरस्त्यात झाले.

सर्वात पहिलं म्हणजे माणसाला त्याची मर्यादा समजली. कारण तंत्रज्ञानाच्या जोरावर तो इतका उंच उडत होता की आपल्या वर कुणी असेल हेच तो पार विसरून गेला. आणि मग त्याच्याही वर उडणाऱ्या निसर्गरूपी गरुडाने एका झटक्यात त्याला पार भुईसपाट केले. ज्या गोष्टी आपण खूप आधीपासून आत्मसात करायला हव्या होत्या त्या कोरोनाच्या महासंकटामुळे आपण आत्मसात केल्या. स्वछतेचं महत्व आपल्याला पटलं आणि आपण स्वतःबरोबरच इतरांची सुद्धा काळजी घ्यायला शिकलो. जेव्हा गरज असते तेव्हा आपल्या कुटुंबाशिवाय दुसरं कुणीही मदतीला येत नाही. आपण कितीही म्हटलं तरी आपलं कुटुंब आपल्यासाठी किती महत्वाचं आहे याची जाणीव आपल्याला झाली. घरातच राहिल्यामुळे आपल्या गरजा किती कमी आहेत आणि आपण किती वायफळ खर्च करतो ह्याची आपल्याला जाणीव झाली. जगण्याचा संघर्ष काय असतो हा आपण याची देही याची डोळा अनुभवला.

कधी नव्हे तो आपल्याला आपल्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवता आला. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हा अलिखित नियम बऱ्याच जणांनी मोडला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अनेकांनी तर ह्या लॉकडाऊनच्या काळात निरनिराळ्या कला शिकून घेतल्या. आपल्या मित्रमैत्रिणींनी तर घरीच केकशॉप थाटली. ह्या सर्व गोष्टींमुळे लॉकडाऊनचा काळ थोडाफार सुसह्य नक्कीच झाला पण स्वभाव गुणधर्मानुसार जर एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की आपल्याला त्या गोष्टींचं ओझं वाटू लागतं. तसंच सुरुवातीला घरी राहण्यात आनंद मानणाऱ्या आपल्या सर्वांनाच नंतर घरी राहण्याचा कंटाळा येऊ लागला. पूर्वी निदान सोमवार ते शुक्रवार तरी कामाच्या निमित्ताने बाहेर असायचो पण आता सोमवार ते शुक्रवार घरीच आणि विकेंडसुद्धा घरातच ह्यामुळे मानसिक स्थिती बिघडली.

आज वर्षाचा शेवटचा दिवस. तसं पाहायला गेलं तर ह्या वर्षात आपल्याला फक्त जगायचं होतं. आपलं अस्तित्व टिकवायचं होतं आणि आपण त्यात बऱ्यापैकी यशश्वी झालो आहोत. पण आपल्यावरचं संकट अजूनही टळलेलं नाही त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी. पुढे काय वाढून ठेवलय ह्याचीसुद्धा आपल्याला काही कल्पना नाहीये त्यामुळे एकमेकांच्या साथीने आपण येणाऱ्या संकटांना धैयाने तोंड देऊ आणि पुढील वर्ष आपल्या सर्वाना सुखसमृद्धीचे जाईल अशी आशा करू.

© PRATILIKHIT

Make sure you also check our other articles in Marathi.
इतर मराठी लेख

21221cookie-check२०२०

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,029 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories