महाराष्ट्र दिन – अभिमान की एक दिवसाची सुट्टी
क्या भाई.. कैसा है?? क्या हलचल..??? दोन मराठी तरुणांची भेटल्यावर हाक मारायची नेहमीची सवय..आणि बरं का..हेसुद्धा त्याच मंडळींपैकी ज्यांनी आदल्या दिवशी असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘जय महाराष्ट्र’ , ‘गर्व आहे मला महाराष्ट्रीय असल्याचा ‘ असे फोटो व्हाट्स अँपच्या स्टेटस आणि फेसबुकच्या भिंतीवर टाकले होते. म्हणजे एक दिवस काय तो मराठी असल्याचा अभिमान.. तसं बघितलं तर मोजून तीन दिवस..महाराष्ट्र दिन, मराठी भाषा दिन आणि गुढीपाडवा. इतर दिवशी आपण रोजच्या व्यवहारात मराठी भाषा वापरतो का??
आता यावर तुम्ही नेहमीची कारणं देणार…बरेचसे मित्रमैत्रिणी हे अमराठी आहेत..ग्रुप मध्ये असलं की मग हिंदी किंवा इंग्रजीतच बोलावं लागतं. मान्य आहे..पण जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या मराठी माणसाशी बोलता तेव्हा तरी मराठीतून बोला ना..आपण अनोळखी व्यक्तीशी सुद्धा बोलताना हिंदी किंवा इंग्रजीमधूनच सुरुवात करतो. हिंदी या साठी की त्या माणसाला मराठी येत नसेल हाच विचार पहिल्यांदा आपल्या मनात येतो. पहिले हिंदी बोलून मग आपण मराठीवर येतो..का?? आपण सुरुवात मराठी मधून का नाही करत?? सुरुवात करावी आपल्या मराठी मधून..पुढे मग जर समोरच्याला मराठी येत नसेल तर मग हिंदी किंवा इंग्रजी मध्ये बोललो तर ठीक आहे.आपण मराठीमधून बोलायला सुरुवात केली की समोरचा मोडकंतोडकं का होईना मराठी बोलतोच हा माझा अनुभव आहे.
एकीकडे आपण मराठी वाचवा चळवळ म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडायचं आणि आपणच त्याकडे दुर्लक्ष करायचं. परप्रांतीय लोंढे वगैरे हा सगळा वेगळा मुद्दा पण आपली भाषा टिकवण्यासाठी आपणच मेहनत घ्यायला हवी. नाहीतर पुढे मराठी भाषा शिल्लक राहील की नाही हे सांगणं सुद्धा कठीण आहे. तरुणाई सध्या ‘bro’ वरून ‘भावा’ वर आलीये खरी पण एवढ्यावरच थांबून चालणार नाही. आपली संस्कृती ,आपला अभिमान आपल्यालाच जपायचा आहे.
जय महाराष्ट्र
©प्रतिक प्रवीण म्हात्रे.

No Comment