
गरीब की श्रीमंत ????
खरं तर ह्या विषयावर विचार करावा तितका कमीच आहे. आजूबाजूच्या परिस्थितीचं नुसतं निरीक्षण जरी केलं तरीसुद्धा समाजात असलेली विषमता लगेच आपल्या नजरेस जाणवते. समाजातल्या प्रत्येक स्तरावर आपल्याला माणसांमधली तफावत आढळून येते. त्यांचं राहणीमान, त्यांची सद्य परिस्थिती आणि त्यांची आर्थिक तसेच सामाजिक परिस्थिती यांत खूप फरक असतो.
अनेकदा असं होतं की वरवर दिसणाऱ्या श्रीमंतीकडे लोकं आकर्षित होतात आणि श्रीमंत व्हायचं म्हणून चुकीचा मार्ग निवडतात. चांगला मार्ग पत्करूनसुध्दा आपल्याला श्रीमंत होताच येतं असं नाही. मध्यंतरी चर्चेचा विषय ठरलेली राधिका मसालेची राधिका सुभेदार…अमुक एक मालिका म्हणून ती मनोरंजनासाठी बघणं ठीक आहे..पण त्यावर किती ती चर्चा..त्या एका घटनेचा विनोद करून नंतर कोणा आजोबांनी सुरू केलेल्या मसाला उद्योगाला मिळालेला नावलौकिक, त्यांची यशोगाथा इथपर्यंत हा विषय जाऊन पोहोचला. पण मुळात सर्व असं साधं सरळ आहे का?? तसं असतं तर आज आपल्या देशात गरिबी राहिलीच नसती.
आपल्याकडील गरिबी ही मुळात आपल्या लोकांच्या मानसिकतेमधून आली आहे. आपल्याकडे आपल्या गरजेव्यतिरिक्त अवाजवी खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा नाही म्हणजे आपण गरीब…अशी अनेकांची समजूत असते. स्वतःच्या घरात राहून गगनचुंबी स्वप्न पाहणाऱ्यांनी एकदा तरी थोडं बाहेर पडून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण इतरांच्या मनाने किती तरी सुखी आहोत. मागेच एक सुंदर वाक्य वाचनात आलं होतं. ‘ तुमच्या जवळ जर कोणी मदतीची याचना केली आणि तुम्हाला त्या व्यक्तीला मदत करायला जमत असेल तर तिला ती मदत करा. कारण तुम्ही इतके तरी नशीबवान आहेत की तुम्हाला दैवाने याचना करणाऱ्यांमध्ये नाही तर मदत करणाऱ्यांच्या पंक्तीत बसवलं आहे.’
सुखाचा हव्यास हा सर्वांनाच असतो..पण म्हणून कोणाचं तरी बघून तशाच गोष्टी आपल्याला हव्यात म्हणून आहे ते सुख टाकून स्वतःच्या नशिबाला दोष देत जगण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मानून जगलं तर आपलं जगणं अधिक समृद्ध होणार नाही का ??
एक छानसं उदाहरण इथे देता येईल. नेहमी पायी जाणाऱ्या माणसाने एखाद्याला सायकल चालवताना पाहिलं तर त्याला त्या व्यक्तीचा हेवा वाटतो. आपल्याकडेही अशी एखादी सायकल असावी असं त्याला वाटत. पण त्याच वेळी सायकल असलेली व्यक्ती दुचाकी असलेल्या व्यक्तीचा हेवा करते. दुचाकीवाली व्यक्ती चारचाकी असलेल्या व्यक्तीचा…पण या सगळ्यात आपण नेहमी आपल्या पेक्षा उत्तम परिस्थिती असलेल्या व्यक्तीशीच स्वतःची तुलना करतो. कधी तरी खालच्या स्तरावर जाऊन पहा..मग तुम्हाला लक्षात येईल की आपण त्या मानाने किती तरी नशीबवान आहोत. आज आपण न आवडणाऱ्या अनेक गोष्टी थोडे दिवस वापरून फेकून देतो. कितीतरी टन अन्न रोज वाया घालवतो. आपल्याला मिळतंय म्हणून आपल्याला त्याचं फार काही वाटत नाही पण त्याच सर्व गोष्टी मिळाव्यात म्हणून कितीतरी जणं रोज ते स्वप्न पाहत असतात.
सांगायचा मुद्दा एवढाच की आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मानणं महत्वाचं..अधिक मिळवण्यासाठी प्रयत्न जरूर करावे..पण मिळालं नाही तर नाराज होता कामा नये…तसं हे थोडं कठीण काम आहे कारण ‘दिल है के मानता नहीं..’ पण ही गोष्ट ज्याला जमली त्याच्यासारखा श्रीमंत माणूस तोच.
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
Khup chhan😍👌👌itka sundar sadhya soppya shabdat sagla mandlays😍🙌🙌