मरण स्वस्त होतंय…..
अगदी आज सकाळचाच प्रसंग…डोळ्यांसमोर घडलेला…7.52 विरार बोरिवली लोकलमध्ये मला कशी कोण जाणे पण विंडो सीट मिळाली…ती वेळ म्हणजे मुंबईतील सर्वच चाकरमान्यांची ऑफिसची वेळ…त्यामुळे त्या वेळेला लोकलला प्रचंड गर्दी असते…इतकी की नाला सोपारा वरून डाऊन येणारे पण स्टँडिंग येतात..आणि अशा वेळेला विरारला चढून नुसती सीटची अपेक्षा करणं म्हणजे दिवसाढवळ्या तारे शोधण्यासारखं आहे मग विंडो सीटची गोष्ट तर सोडूनच दिलेली बरी…
भाईंदर स्टेशन येईपर्यंत सगळं रोजच्यासारखं सुरू होतं… भाईंदर स्टेशनला दोन तरुण मुलं दरवाज्यातून मध्ये जायला जागा नव्हती म्हणून फक्त पायाची टाच टेकवता येईल एवढ्याश्या जागेवर एक पाय ठेवून आणि दुसरा पाय हवेत ठेवून दरवाज्याला लटकली…लोकांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला पण आपल्याला ऑफिसला किंवा कॉलेजला लवकर पोहोचायची घाई असते त्यामुळे आपण जसं लोकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं तसंच त्यांनीही केलं आणि ट्रेन सुटली..ट्रेन ने प्लॅटफॉर्म सोडला असेल आणि अचानक कोणतरी ओरडला…मी विंडो मधून मागे पाहिलं तर ते दोघेही तरुण धावत्या ट्रेन मधून खाली पडले होते..प्लॅटफॉर्म ला लागूनच सांडपाणी जाण्यासाठी एक नालावजा खड्डा कोणीतरी खोदून ठेवला होता… त्यात पाणी नव्हतं त्यामुळे तो नाला सुकलेला होता..त्यांच्या सुदैवाने ते त्या खड्ड्यातच पडले..थोडं जरी इकडे तिकडे झालं असत तर त्यांच्या जीवावर बेतलं असतं..जीव तर वाचला पण त्यांना कितपत लागलं हे मात्र कळू शकणार नाहीये…
हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण इतकंच की आपणसुद्धा कधीतरी असा अविचार करतोच..आतमध्ये जाण्यासाठी जागा नसली तरी आता दरवाज्याला लटकलं की ट्रेन सुरू झाल्यावर आपोआप जागा होते असा समज करून आपण दरवाज्याला लटकतो…आणि मग असं काहीतरी विपरीत घडतं.. सगळयांनाच लवकर पोहोचायचं असतं… तर आपल्याला लवकर पोहोचायचं आहे म्हणून थोडं लवकर निघालो तर कुठे बिघडणार आहे….उशीर झाला म्हणून घाई करण्यापेक्षा थोडं लवकर निघालेलं कधीही चांगलंच…
आता तुम्ही म्हणाल की अशा घटना तर रोज घडतात..आणि रोज ऐकतो…यात नवीन काय….तर नवीन असं काही नाहीये…पण जेव्हा अशी एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडते तेव्हा ती आपल्याला त्या गोष्टीबद्दल विचार करायला भाग पाडते..त्यानंतर आपलं आपणंच ठरवायचं असतं की त्यांमधून आपल्याला काय शिकायचं आहे.
Have a safe journey.
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment