निकालानंतर भाजपाला आत्मपरीक्षण गरजेचं…
निकालानंतर भाजपाला आत्मपरीक्षण गरजेचं…


कालचा लोकसभेचा निकाल हा देशाच्या जनतेने दिलेला अभूतपूर्व निकाल आहे. कोणत्याही गटाला एकहाती सत्ता न देता सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही काठावर ठेवून पुढची पाच वर्षे मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे सत्ताधारी आहे ती सत्ता टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. या सगळ्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीने खालील गोष्टींवर आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
१. लोकांनी इतकी वर्षे नाकारलेल्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांना पुन्हा उमेदवारी देणं.
2014 साली भाजपाने काँग्रेस हटावचा नारा दिला होता आणि सत्तर वर्षे त्याच पक्षाला वैतागलेल्या लोकांनी मोदींना बहुमताने निवडून दिलं होतं. परंतु 2024 ला काँग्रेसने भाजपाला शह देण्यासाठी उरल्या सुरल्या सगळ्या पक्षांना सोबत घेतलं आणि त्यामुळे थोडंफार दबावाखाली येऊन का होईना भाजपाने सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांना उमेदवारी दिली आणि इथेच लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला. कारण ज्या पक्षाला नाकारून लोकांनी भाजपाला निवडलं होतं त्याच पक्षाला भाजपाने सोबत घेतलं. जर त्या जागी भाजपाने स्वतःचे उमेदवार लढवले असते तर कदाचित निकाल वेगळा असता.
२. अननुभवी लोकांना उमेदवारी देणं
महाराष्ट्रात अनुभवी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राजकारणाचा फारसा काही अनुभव नसलेल्या आणि नवख्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. कौटुंबिक गोष्टींचा विचार करून कुटुंबातील व्यक्तीच्या समोर कुटुंबातील व्यक्ती उभी केल्यास जास्त सिपंथी मिळेल असा विचार करून हे करण्यात आलं असलं तरी लोक तसा विचार करत नाहीत. शिवाय कारण काही का असेना, अजित पवारांनी पक्ष सोडल्याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात होताच.
३. आंतरराष्ट्रीय बाबींकडे लक्ष देताना देशांतर्गत गोष्टींकडे झालेलं दुर्लक्ष
आज संपूर्ण जगभरात भारताची जी इमेज झाली आहे ती भाजपामुळे झालेली आहे यात शंकाच नाही. बलाढ्य देशांशी स्थापन केलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे आज जगाच्या नकाशावर भारताला एक वेगळी ओळख मिळालेली आहे पण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनातलं स्थान जपायला भाजप कुठे तरी कमी पडल्याचं दिसतं. आज देशात जवळ्पास सत्तर टक्के लोकं अजूनही खेड्यात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोष्टींशी त्यांना खरतर काहीच घेणंदेणं नसतं कारण त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे यापुढे भाजपाने ती नस ओळखायला हवी आणि त्यानुसार पावलं उचलायला हवी.

No Comment