
गुन्हेगार

गुन्हेगार
गेल्या काही महिन्यांत संपूर्ण देशभरात तरुणींवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. त्याच घटनांचं लोण आता महाराष्ट्रातही पसरतय. पुण्यात MPSC पास दर्शना पवार हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना घडणं नक्कीच विचार करायला भाग पडतं. लग्नाला नकार दिला म्हणून मित्र राहुल हंडोरेने एका तरुणीची राजगडाच्या पायथ्याशी निर्दयीपणे हत्या केली होती.
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार कोथरुड येथील कॉलेजमध्ये 12 वी ला असताना आरोपी आणि तरुणी एकावर्गात होते. मुलाच्या विचित्र वर्तणुकीमुळे तरुणीने त्याच्याशी बोलण बंद केलं. तेव्हापासून शंतनूच्या मनात तिच्याबद्दल राग होता. तो सतत तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. तरुणीने आरोपीशी बोलण्यास नकार दिला. त्या रागातून आरोपीने हे कृत्य केले असल्याचे सांगण्यात येते.
अर्थात त्यांच्या खासगी आयुष्यात काय घडलंय ह्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये पण ह्या सगळ्या घटनांवरून एक प्रश्न नक्कीच पडतो की सध्याची तरुण पिढी इतकी बेफिकीरपणे का वागतेय? घरच्यांकडून मिळणाऱ्या अवाजवी स्वातंत्र्यामुळे त्यांना चांगल्या वाईट गोष्टी कळत नाहीयेत की त्यांना कायद्याची राहिलेली नाहीये की त्यांना होणाऱ्या परिणामांची चिंता नाहीये की आणखी काही वेगळ कारण आहे ह्याचा मुळापासून शोध घ्यायला हवा.
हल्ली तरुणाई शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने आपल्या घरच्यांपासून लांब राहते. त्यामुळे त्यांच्या घरच्यांचा त्यांच्याशी हवा तसा कॉन्टॅक्ट राहत नाही. आपला मुलगा किंवा मुलगी काय करतेय, कुठे राहतेय ह्याबद्दल आईवडील अगदीच अनभिज्ञ असतात. समजा आईवडिलांनी त्याबाबत चौकशी केली किंवा अधिक काही विचारलं तर ते आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याची भावना मुलांमध्ये निर्माण होते. त्याचं कारणही त्यांचे मित्रमैत्रिणीच आहेत. माझ्या मित्राला इतकं स्वातंत्र्य आहे, तो रात्री बेरात्री कुठेही जाऊ शकतो पण मला कुठे जायचं असेल तर जाऊ दिलं जात नाही असा विचार हल्लीच्या तरुण पिढीच्या मनात हमखास येतो आणि मग त्यामुळे बऱ्याच गोष्टी पालकांपासून लपवल्या जातात आणि त्याची परिणीती एखाद्या गुन्ह्यात अडकल्याने होते. कारण घरच्यांपासून गोष्टी लपवल्यामुळे हवं तसं मार्गदर्शन मिळत नाही आणि मग तरुण चुकीच्या रस्त्याला लागतात.
मुलांना/मुलींना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी जितकी पालकांची आहे तितकीच ती मित्रांचीसुद्धा आहे. कारण ज्या गोष्टी पालकांसोबत शेअर केल्या जात नाही त्या मित्रांसोबत शेअर केल्या जातात. समोरच्याच्या मनात काय चाललंय ह्याची कल्पना आली की त्याला त्या चुकीच्या गोष्टीसाठी प्रोत्साहन न देता योग्य मार्गावर आणणं ही मित्राचीही जबाबदारी आहे.
आणि राहिला प्रश्न गुन्हेगारांच्या शिक्षेचा तर सर्वसामान्य माणूस आत्मरक्षणासाठी सुरा उगरतानाही दहा वेळा विचार करतो त्यामुळे एखाद्याचा जीव घेण्याच्या हेतूते हल्ला करून त्याला संपवण्याचा प्रयत्न जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून केला जातो तेव्हा त्या माणसातलं माणूसपण संपलेलं असतं. त्याच्याकडे दुसरा काही पर्यायच उरला नसेल, त्याची मनस्थिती ठीक नसेल ह्या सगळ्या गोष्टी भंपक आहेत. गुन्हेगाराकडून गुन्हा झाला आहे आणि त्याला त्या गुन्ह्याची तितकीच कठोर शिक्षा झाली पाहिजे.
गुन्हेगार
जे काही घडतं आहे यात मुलांना मिळणार स्वातंत्र्य जबाबदार नाही तर एका नाजूक वयात असताना जे एक योग्य मार्गदर्शन मिळायला हवं ते मिळत नाही . प्रेम , आकर्षण, वासना आणि विभत्सपणा यातला फरक समजावून सांगणं गरजेचं आहे आणि ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था सुधरवन आवश्यक आहे.तरुण पिढीत कायद्याचा धाक नाही हे मात्र खर आहे.