
Articles
आत्महत्या – एक चुकलेलं पाऊल
आत्महत्या – एक चुकलेलं पाऊल
नैराश्याशी कसं लढायचं हे शिकवणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली आणि आत्महत्या हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आपल्या कार्यातून, विचारातून इतरांना योग्य दिशा दाखवणारी माणसे जेव्हा स्वतः चुकीचं पाऊल उचलतात तेव्हा खरोखरच मन अगदी सुन्न होतं.
सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करणारे, आपल्या विचारांनी इतरांना जगायला बळ देणाऱ्या साने गुरुजींनीही अशीच आपली जीवनयात्रा संपवली. समस्त समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या आणि आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भैय्युजी महाराजांनीही स्वतःच जीवन संपवलं. छिछोरे सारख्या चित्रपटामधून आत्महत्या हा पर्याय नाही हे दाखवणाऱ्या सुशांतसिंग राजपूतनेसुद्धा अखेर आत्महत्याच केली. सर्वांना मनशांती शिकवणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद यांनी मंत्रालयावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.
हे झाली सगळी सेलिब्रिटींची उदाहरणे. सामान्य माणसांची तर गणतीच नाही. त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. कुणी चिट्ठी लिहिली असेल तर ठीक नाहीतर फक्त तर्क लढवले जातात. पोस्टमार्टम फक्त शारीरिक बाबींवर निकाल देतं पण मनाचं काय?? त्याचा थांगपत्ता लागतो का??? आत्महत्या करणं हाच एक शेवटचा उपाय असतो का?? अर्थात हा निर्णय घेणं सोपं नक्कीच नसतं कारण साधं बोट कापलं तरी कळवळतो आपण मग स्वतःच्या हाताने स्वतःची नस कापून घेणं इतकं सोपं असेल??? साधं धडपडून खरचटलं तरी चुरचुरतं आपल्याला मग उंचावरून उडी मारणं सोपं असेल??? पण तरीसुद्धा तो निर्णय घेतला जातो म्हणजे काहीतरी नक्कीच घडलं असणार जे ती व्यक्ती इतरांसोबत शेअर करू शकत नाहीये.
आपलं मन हे एखाद्या धरणासारखं असतं. पाण्याचा साठा गरजेपेक्षा जास्त झाल्यावर त्या धरणाचे दरवाजे उघडावेच लागतात नाहीतर ते धरण फुटून गावच्या गावं उध्वस्त होतात. तसच आपल्या मनातसुद्धा अनेक चांगल्या वाईट गोष्टी सतत येत असतात. आपण त्याचा योग्य त्या वेळी निचरा होणं आवश्यक असतं आणि माणूस म्हटला की त्याच्या आयुष्यात अडीअडचणी, ताणतणाव हे आलेच. ह्या साठी मित्र नावाचा दरवाजा आपल्याकडे असतो. आईवडिलांशी आपण बोलू शकतो पण सगळ्याच गोष्टी त्यांच्याशी शेअर करू शकत नाही. जनरेशन गॅपमुळे म्हणा किंवा संकोचामुळे आपण काही गोष्टींबाबत आईवडिलांशी बोलण्याचं टाळतो. पण मित्रांच्या बाबतीत असं नसतं. आपण अगदी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा त्यांच्याशी शेअर करू शकतो. फक्त त्यांनी आपल्याला येऊन विचारावं याची आपण वाट पाहत बसतो आणि मग तसं नाही झालं तर आपण दुःखी होतो. सगळ्यांनाच स्वतःच्या अडचणी असतात. स्वतःच वेगळं आयुष्य असतं. त्यामुळे आपला मित्र आपल्याला स्वतःहून येऊन काही विचारेल यासाठी अडून न राहता आपण त्याला संपर्क करायला काय हरकत आहे. शेवटी महत्वाचं काय आहे?? मित्राने स्वतःहून विचारणं की आपलं व्यक्त होणं???
दुसरं म्हणजे आपण स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. त्यासाठी निर्लज्ज झालात तरी चालेल. कारण जर लोकांचा विचार करत बसलात तर मार्ग सापडणारच नाही. लग्नाच्या पंगतीत फुकट जेवूनसुद्धा त्याच जेवणाला नावं ठेवतात लोक. त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःच्या आयुष्याशी खेळणं कितपत योग्य आहे. करोडो रुपयांचा घोटाळा करणारे परदेशात जाऊन इथे घडणाऱ्या गोष्टींची अजिबात फिकीर न करता आरामाचं आयुष्य जगत आहेत.
जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा तिच्यासोबतच तिच्या कुटुंबाचसुद्धा आयुष्य उध्वस्त होतं. त्यामुळे टोकाचं पाऊल उचलण्याआधी एकदा आपल्या माणसांशी बोलून बघा. मार्ग नक्कीच निघतो. तुमच्या एका हाकेला तुमची हक्काची दहा जण नक्कीच धावून येतील. पण त्यासाठी तुम्ही व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. तेव्हा ‘व्यक्त व्हा…’
No Comment