
विचार बदला….देश बदलेल…
भारताला महासत्ता बनवण्याच्या उद्देशाने आजकाल संपूर्ण देशभरात नानाविध मोहिमा राबवल्या जातात. त्यातलीच एक मोहीम म्हणजे स्वच्छ भारत अभियान. तसं पाहायला गेलं तर आपला परिसर, आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला मोहीम राबवावी लागतेय हीच किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मोहीम राबवूनही खरंच आपला देश स्वच्छ झाला का ??? किती जण स्वतः आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा म्हणून खबरदारी घेतात. आजूबाजूचा म्हणजे आपलं घर नाही हा…कारण आम्ही काय करतो..घरातला सगळा कचरा गोळा करतो आणि रस्त्यावर आणून त्याची रास मारतो. बाजूला कचराकुंडी ठेवलेली असतानासुद्धा कचरा मात्र आम्हाला बाहेरच टाकायचा असतो. उचलतील घंटागाडी घेऊन येणारे…. का??? ती माणसे नाहीत??? तुम्ही घाण करायची आणि त्यांनी येऊन ती साफ करायची हा काय नियम आहे ?? की तुम्हाला कचरा करण्याचंही स्वातंत्र्य दिलं गेलंय????
आपण परदेशाच्या इतक्या गमजा मारतो पण तिकडचे नियम, तिकडच्या लोकांची शिस्त आपण पाहत नाही. त्यांचे रस्ते इतके स्वच्छ कसे, तिकडचे नागरिक त्यांचा देश स्वच्छ राहावा म्हणून काय काळजी घेतात या सर्व गोष्टींचा विचार न करता आपण सरळ अस्वच्छतेचं खापर इतर गोष्टींवर फोडून टाकतो. अजून किती वर्ष आपण आपल्या बेजबाबदारपणाचं खापर लोकसंख्येवर, सरकारवर फोडत बसणार आहोत. झाली आता लोकसंख्या शंभर करोड… बरं मग…आता ती कमी होणार आहे का??? नाही ना..मग जे झालंय तीच गोष्ट खोदत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या केल्या तर देश सुधारणार नाही का???
मुळात आपल्या लोकांची मानसिकताच नसते की आपण चांगल्या जागेत राहावं. रस्ताने चालता चालता स्वतःच्या पायाखालीच थुंकतात लोकं. असं कोण समोर थुंकताना दिसलं की अशी चिड येते ना..सरळ जाऊन त्याला जाब विचारावासा वाटतो. कधी कुणी तोंडात गुटका भरून ठेवतात आणि मग चघळून झाल्यावर आसपासच्या भिंतीवर ड्रॅगन सारखी रक्ताची उलटी करतात. रेल्वे ब्रिजच्या फटीफटीत अशी रंगरंगोटी नेहमीच झालेली आपल्याला दिसून येते. असं कुणी करताना आढळलं ना तर त्याला कागदी पिशव्या फुकट द्यायला हव्यात. त्यातच थुंका आणि ठेवा तुमच्याच बॅग मध्ये..जा घेऊन घरी म्हणावं..
दोन पावलांवर कचराकुंडी असली ना तरी आम्हाला दिसत नाही. डोळ्यावर पट्टीच बांधलीये ना आम्ही गांधारीसारखी..जरा कचराकुंडी शोधून कचरा त्यात टाकावा पण नाही..आम्हाला घाणीतच राहायचं.. डुकरासारखा आम्हाला घाणीचा वासचं हवा..आरोग्य वगैरे काय असतं ते महानगरपालिका कर्मचारी वगैरे पाहून घेतील ?????
निदान थोडी तरी जबाबदारी आपण उचलायला हवी. स्वतःच्या मनाची लाज म्हणून तरी आपण आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. स्वतःपासून सुरुवात केली तरी तुमचं बघून आणखी दोन तीन जण तरी नक्कीच तसे वागतील. आणि आजच्या तरुणाईने तर या कडे अधिक बारकाईने लक्ष द्यायला हवं.
© PRATILIKHIT
No Comment