Articles
भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर
भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर
भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर
‘लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी चालविलेले राज्य’ अशी लोकशाहीची व्याख्या आपण अगदी लहानपणापासून शाळेच्या नागरिकशास्त्रच्या वर्गात ऐकत आलेलो आहोत. पण सध्या देशात किंवा राज्यात सुरू असलेलं राजकारण पाहिलं की ही व्याख्या खरंच योग्य आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण आता राजकारण हे लोकांच्या विकासासाठी कमी आणि नेत्यांचे खिसे भरण्यासाठी जास्त वापरलं जातं.
मुळात कोणताही नेता हा जनतेचा सेवक असतो हेच नेतेमंडळी विसरून गेली आहेत. किंबहुना आपणच नेत्यांना ‘साहेब’ ही पदवी बहाल करून त्यांचं जनतेप्रति असलेलं कर्तव्य विसरायला लावलं आहे. आताच्या राजकारण्यांना जनहिताची कामं करण्यात कमी आणि एकमेकांना टोले लागवण्यातच जास्त स्वारस्य असतं.
घराणेशाही हा भारताच्या लोकशाहीला लागलेला फार मोठा शाप आहे. लायक नसतानाही केवळ घरातली जेष्ठ व्यक्तीचं पक्षात वजन आहे म्हणून स्वतःचं काहीही कर्तृत्व नसताना, समाजसेवेचा काहीही अनुभव किंवा इच्छा नसताना नेत्यांची मुलं आपसूक त्यांच्या जागेवर येऊन त्यांची जागा घेतात आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आयुष्यभर फक्त कार्यकर्ताच बनून राहावं लागतं. जेव्हा कुणी तरुण काहीतरी बदल आणण्याच्या दृष्टीने राजकारणात पाऊल ठेवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या वर बसलेले वरिष्ठ एकतर त्याला पाऊल ठेवू देत नाहीत आणि जर ठेवू दिलंच तर त्याने काही चांगले निर्णय घेण्याच्या आतच त्याला बाजूला केलं जातं.
त्यावर कळस म्हणजे एखाद्या गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगलेल्या किंवा जामिनावर बाहेर आलेल्या नेत्याला पुन्हा तिकीट मिळतं, तो निवडून येतो येतो आणि त्याला पुन्हा मंत्रिपदही मिळतं याहून जास्त दुर्दैव ते कोणतं ?? आज देशातल्या अर्ध्याहून जास्तं नेत्यांवर कोणत्या ना कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. सर्वसामान्य माणसाला मात्र नोकरीसाठी साधं NOC मिळवण्यासाठीसुद्धा पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागतात.
देशाची जर प्रगती होणं अपेक्षित असेल तर तो देश चालवणारे जबाबदार लोक सुद्धा प्रगत विचारांचे आणि त्या त्या क्षेत्रातील अनुभवी हवेत. आपल्या देशातील राजकरणाविषयी तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. स्टेट PSC, UPSC, IAS अशा मोठमोठया आणि कठीण परीक्षा पास होणाऱ्या अधिकाऱ्यांना कधीकधी कमी शिकलेल्या किंवा वशील्यामुळे उच्च पदांवर विराजमान असलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं. आपल्या देशाच्या किंवा राज्याच्या बऱ्याचशा मंत्र्यांना देशाचा किंवा राज्याचा इतिहास, भौगोलिक परिस्थिती ह्याचसुद्धा ज्ञान नसतं.
प्रत्येक महत्वाच्या पदासाठी जर त्या पदाशी निगडित एखादी पात्रता परीक्षा ठेवली तर लायक उमेदवारालाच ते पद मिळेल. आणि त्याचा आपल्या देशाला नक्कीच फायदा होईल. आपल्या देशाचा आरोग्यमंत्री एखादा डॉक्टर असेल, अर्थमंत्री एखादा अर्थतज्ञ असेल, गृहमंत्री एखादा निवृत्त लष्करी अधिकारी असेल, कृषीमंत्री एखादा शेतीतज्ञ असेल. मग देशाची प्रगती का होणार नाही?? देशातील सर्वांनी आपापसातल्या वादांसोबतच देशाची प्रगती होईल ह्याकडे लक्ष द्यायला हवे.
Also Read
Follow PRATILIKHIT
Join us on TELEGRAM
marathi articles, marathi nibandha, marathi essay, marathi kavita, marathi quotes, indian politics, india’s future
भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर
1 Comment