सकाळी रश्मीला जाग आली ती पक्षांच्या किलबिलाटानेच..मुंबई सारख्या शहरात क्वचितच ऐकू येणारा पक्षांचा मंजुळ आवाज इथे मात्र सर्वत्र ऐकू येत होता. आजूबाजूला बरीच झाडी असल्यामुळे सगळे पक्षी तिकडे आकर्षित व्हायचे. रश्मीने पटापट सगळं आवरून तिच्या रूम मधल्या बाकी मुलींना उठवलं आणि मुलांना उठवण्यासाठी अविनाशला फोन केला.
सगळ्यांनी आवरून त्याच हॉटेल मध्ये शेगावच्या प्रसिद्ध कचोरीचा नाश्ता केला आणि फिरायला बाहेर पडले. कालचा पूर्ण दिवस आणि अर्धी रात्र बाईक चालवली असल्यामुळे त्या सगळ्यांनीच हॉटेलवाल्याच्या कार मधून जाणं पसंत केलं.
सुरुवातीला त्यांना दर्शन झालं ते गजानन महाराजांच्या समाधीचं… थोडा वेळ तिथे थांबून ते तिथेच असलेल्या मेडिटेशन सेंटर मध्ये गेले. तसे ते सर्व जण अशांतच…म्हणजे थोडावेळही शांत बसायचं म्हटलं तरी यांना ते जमायचं नाही. पण काही तरी वेगळं करायचं म्हणून मग सगळ्यांनी तो अनुभव घेतला.
एव्हाना दुपार झाली होती.सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. मग मठातच महाप्रसाद घेऊन थोडा वेळ ते आनंद सागर मध्ये बसले. आजूबाजूला होणारे प्राण्यांचे, पक्षांचे कृत्रिम आवाज त्यांचे लक्ष वेधून घेत होते. थोडा वेळ आराम केल्यावर ते पुन्हा फिरायला बाहेर पडले. तिकडे असलेलं मत्स्यालय बघून तर अविनाश खूपच खुश झाला. त्याला लहानपणापासूनच मासे पाळायची हौस होती. त्याच्या घरी टॅन्क होता ज्यात त्याने त्याला आवडणारे डिस्कस ठेवले होते. त्या मत्स्यालयात तो एवढा हरवून गेला की थोडावेळ त्याला आजूबाजूच्या जगाचा विसर पडला. सगळ्यांना फिरून कंटाळा आला पण अवि मात्र परत परत त्याच माशांना बघत होता. मग शेवटी सगळे जण बाहेर जाऊन बसले पण अविला एकट्याला सोडायला नको म्हणून रश्मी त्याच्यासोबत थांबली.
आता बाकी होतं ते शेगावचं प्रमुख आकर्षण…पावणे सात वाजता सुरू होणारा वॉटर शो…सगळे येऊन शो ची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. रंगीबेरंगी लाईट मध्ये ती पाण्याची कारंजे खूपच आकर्षक दिसत होती. जणू काही रश्मीला झालेला आनंद, तिच्या भावना त्या पाण्याच्या रूपाने उचंबळून येत होत्या. तिला अचानक काय झालं कोणास ठाऊक पण तिने अविनाशचा हात एकदम घट्ट पकडला.
” काय ग…?? काय झालं…”
” अवि….तुला काही तरी सांगायचंय…म्हणजे मला स्वतःलाच अजून नक्की माहीत नाहीये…म्हणून तुला सांगतेय….मी खूप confused आहे..मी ना….”
” रश्मी….काय झालं….बिनधास्त सांग…काहीही टेन्शन घेऊ नकोस…ग्रुप मधलं कोणी काही बोललं का???”
” अरे नाही…ग्रुप तर खूप मस्त आहे तुझा..मला वाटलंच नाही की मी पहिल्यांदा भेटतेय सगळ्यांना….असं वाटत होतं की आम्ही सगळे आधी पासून ओळ्खतोय…”
” अच्छा..मग…काय झालं…”
” अवि..मला असं वाटतंय….”
” काय वाटतंय???” अविनाशने प्रश्नार्थक नजरेने विचारलं.
” मला आवडतोस तू…” रश्मीने डोळे बंद करून एका दमात सांगून टाकलं.
” काय….” अविनाशने आश्चर्याने बघतच राहिला.
” हो…म्हणजे माझं प्रेम आहे की नाही हे मला माहित नाही…ते एवढ्यात सांगताही नाही येणार मला..पण मला आवडत तुझ्या बरोबर राहायला..सतत तुझ्याशी बोलावसं वाटत..”
” खरं सांगायचं तर माझीही अवस्था फार काही वेगळी नाहीये…” अवि तिची नजर चुकवत म्हणाला. ” पण जस तू म्हणालीस की हे प्रेम आहे की आकर्षण ते मलाही माहीत नाही..आणि एवढ्यात ते कळणारही नाही..कदाचित आपण नेहमी एकत्र असतो म्हणून आपल्याला एकमेकांची सवय झाली असेल म्हणून आपल्याला असं वाटत असेल…”
” हम्म…असू शकतं….”
” सध्या तरी काही विचार करू नकोस या गोष्टीचा…जसा वेळ जाईल तसं कळेलच आपल्याला..नक्की काय आहे ते…”
” हो….”
अविनाश असं बोलला खरा पण त्याच्या डोळ्यात रश्मीवरच प्रेम दिसत होतं..रश्मीने थोडा प्रयत्न केला असता तर तिला ते सहज वाचता आलं असतं.
डिनर करून सगळे परत निघाले. ती संपूर्ण रात्र अविनाश आणि रश्मी गप्पा मारत होते. तसे ते आधी पासून एकमेकांसोबत कम्फर्टेबल होते पण आता एकमेकांच्या मनातलं कळल्यामुळे ते थोडे अजून फ्री होऊन बोलू शकत होते. अजून काही दिवस एकत्र राहिल्यावर त्या दोघांनाही एकमेकांबद्दल च्या त्याच्या भावना समजणार होत्या. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. रश्मीच्या मेलबॉक्स मध्ये आलेला एक मेल तिची वाट पाहत होता. कदाचित त्या एका मेल ने त्या दोघांंचही आयुष्य बदलू शकत होतं. पण एकमेकांच्या प्रेमात असलेल्या त्या दोघांना मात्र त्याची अजिबात कल्पना नव्हती.
* नियतीचं पहिलं पर्व इथे समाप्त होत आहे…नियतीला तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद….लवकरच भेटूया….दुसऱ्या पर्वात…..*
@ प्रतिक प्रवीण म्हात्रे
