Site icon PRATILIKHIT

माझ्या स्वप्नातील भारत….

Advertisements

माझ्या स्वप्नातील भारत


आता स्वप्नातील भारत म्हटलं की प्रत्येकाच्या स्वप्नातील भारत सारखाच असला पाहिजे असं काही नाही.. सर्वांच्या स्वप्नातील भारताच्या संकल्पना या भिन्न असू शकतात. आपले विचार कसे आहेत, आपण कोणत्या परिस्थितीच्या संबंधित विचार करतो आहोत आणि  महत्वाचं म्हणजे आपण कोणत्या गोष्टींना महत्व देत आहोत यावर प्रत्येकाच्या स्वप्नातील भारताची संकल्पना अवलंबून असते.

स्वप्नातील भारत म्हटल्यावर सर्वप्रथम माझ्या मनात काही येतं तर ती आहे भारताची सुरक्षा.. आपला भारत हा स्वतःची सुरक्षा स्वतः करण्यास सक्षम असावा. दारुगोळा म्हणा, लढाऊ विमाने म्हणा किंवा युद्धनौका म्हणा..एखाद्या युद्धात लागणाऱ्या सर्व गोष्टी या आपल्या भारतात तयार व्हायला हव्यात..या अत्यंत महत्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी भारताने इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहता कामा नये. आज सरासरी ३०% युद्धसाहित्य आपण आपल्या देशात उत्पादित करतो तर उरलेलं ७०% आपल्याला आयात करावं लागतं.

दुसरा आणि हल्लीच्या दिवसातील महत्वाचा मुद्दा म्हणजे स्त्री सुरक्षितता. ज्या भारतात स्त्रियांना समानतेचा हक्क मिळवून दिला, शिक्षणाचा हक्क मिळवून दिला, स्त्रीला सन्मानाची वागणूक दिली त्याच आपल्या महान भारत देशात स्त्रियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. निर्भयासारख्या किती तरी मुली या घटनांमध्ये बळी पडल्या आहेत याची तर गणतीच नाही..ज्या वेळी आपल्या देशातील प्रत्येक स्त्री सुरक्षित असल्याचं स्वतः समजेल त्या वेळी आपला भारत देश त्याच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत किती तरी पुढे गेलेला असेल.


ज्यासाठी संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरला ते म्हणजे आरक्षण. आरक्षण असणे काही चुकीचं नाही पण त्या आरक्षणाचा लाभ कोणाला होत आहे आणि महत्वाचं म्हणजे ते आरक्षण कोणत्या क्षेत्रात मिळत आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुणवत्तेनुसार शिक्षण किंवा नोकरीची समान संधी मिळायला हवी. शिक्षणासाठी भरावयाच्या फी मध्ये आरक्षण असल्यास कोणाची काहीच हरकत असणार नाही.


सर्वात महत्वाचा मुद्दा ज्याचा पूर्णपणे बिमोड झाल्याशिवाय कोणाच्याही स्वप्नातील भारताची संकल्पना पूर्ण होऊच शकणार नाही तो म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराबद्दल अधिक काही बोलण्याची गरज उरली नाहीये कारण गेल्या निवडणूकिपासून सर्वच जण त्या बद्दल बोलत आहे आहेत. पण ज्या दिवशी रस्त्यावर दिसणारा पोलीस हा आपल्याकडून विनाकारण पैसे उकळण्यासाठी नसून आपली सुरक्षा करण्यासाठी आहे ही भावना सर्वांच्या मनात निर्माण होईल त्याच दिवशी माझ्या स्वप्नातील भारताचा महत्वाचा टप्पा पार झालेला आहे असं मी समजेन.
– प्रतिक प्रवीण म्हात्रे

 

माझ्या स्वप्नातील भारत (दुसरी आवृत्ती)

माझ्या स्वप्नातील भारत – २

4352cookie-checkमाझ्या स्वप्नातील भारत….
Exit mobile version